काही आर्जव आयुष्यभर शालीन असतात
याचा अर्थ असा नसतो की ती मनाशी बंड करत नसतात ,
नाईलाजांच्या कोंदणाखाली आक्रोशात राहतात ती
प्राक्तनाच्या आदेशावर मान तुकवतात ती
आपल्या स्वतःपेक्षाही दुसऱ्यांचा विचार करतात ती ,
काही अशी आर्जव
हळवी कोवळी स्वप्न उगवतच असतात
जर मनाची भूमीच तशी असेल ,
परत परत हिरमुसून आशेच्या हिंदोळ्यांवर
डोलत असतात काही अशी आर्जव
आपल्यात असूनही आपल्याबाहेर पाहायला शिकवतात
आपल्या स्वतःतून चांगुलपणा शोधून त्याची जोपासना करत राहतात,
क्षणोक्षणी एखादा सल वागवत एका वेगळ्याच परिमाणात जगायला शिकवतात
अशी काही आर्जव
काही खेळ हरण्यासाठीच असतात
अन काही अतिप्रिय गमावण्यासाठीच असत ,
हे माहित असून अखेरच्या मुक्कामापर्यंत
स्वप्न पहात राहतात अशी काही आर्जव
कधीतरी त्यांचा विजय व्हावा
कधीतरी त्यांना जगता यावे
खरेखुरे वाटणारे दोन क्षण अनुभवता यावे
अशी काही आर्जव ………
हरीश
No comments:
Post a Comment