ती कविता आठवते तुला ?
अशी सुरेख भावार्थाने म्हटलेली
त्याच्या सौन्दर्याने नटलेला मनाचा गहिवर
स्वरात उतरलेली हळवी थरथर
ती वेळ, तो क्षण, ते भरून आलेल्या मेघासारखं मन
त्यांच्यामधून फुललेलं काहीतरी वेगळं ,आणखीन नवीन
डोळ्यात पाणी आणणार पण त्यासोबत मन भक्कम करणार
अशी रुजवात अशी सोबत असे असणे संदर्भांसहित अथवा संदर्भाविना
याला आता काय अर्थ उरतो ?
अर्थ असतो नवीन अंकुराला
मनावर पसरणाऱ्या शांत लयीला
मनाला सुखावत मनाला समजावत
घट्ट पकडून ठेवणाऱ्या शाश्वत भावनेला
त्यांना बघ हळुवार फुल येतील
अन ती या वाटेवरती सोबत करतील
त्याचा गंध त्याचा स्पर्श त्याचे अस्तित्व
या वाटेवरच्या अवघड वेळांना पाठी असेल
एकट्या एकाकी वेळांना कवेत घेईल
अन आनंदांना समाधानाने बघत असेल
अशी ती कविता आठवते तुला ?
हरीश
No comments:
Post a Comment