आपले मराठीपण #1
आपले मराठी असणे हे मुळातच जन्मतः मिळालेलं उपजत अस देणं आहे.बालपणी आई म्हणून मारलेली पहिली हाक, ज्ञानेश्वरीचे लता दिदींचे अवीट गोडीचे , गीत रामायण मधले अजरामर सुधीर फडके यांनी संस्कारित करत नेलेले हे मराठीपण!
गदिमांचे नाच रे मोरा आंब्याच्या बनात, शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली पासून सुरू झालेला प्रवास राकट देशा खडतर देशा म्हणणारे विंदा, हिरवे हिरवे गार गालिचे मखमालीचे तृण फुलांचे सांगत मोहवणारे बालकवी, पृथ्वीचे प्रेमगीत रचणारे कुसुमाग्रज किती तरी दिग्गज आपल्या माय मराठीची लेकरे आहेत. यांच्या शब्दांमध्ये आपण रंगत गेलो. पाडगावकरांनी तरुण मनाला लोभवत लिहिलेला बोलगाणी कवितासंग्रह अन त्यातल्या तरुण मनाला थेट भिडणाऱ्या कविता हे एक मोठं गारुड आपण अनुभवलं.
या दुव्याला अनेक वर्षांनी जोडत संदीप खरे, वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी मराठी गाण्याला ताजा टवटवीत आयाम दिला. हे सर्व झाले कवितांचे , गाण्यांचे. ललित लेखन, कथा, कादंबरी, नाटके मराठीत किती अप्रतिम लिहिली गेली. पु ल देशपांडे, व पु काळे, व्यंकटेश माडगूळकर, रवींद्र पिंगे, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, गूढ अलौकिक प्रतिभा लाभलेले जी ए कुलकर्णी , एक वेगळाच पायंडा पाडून चाकोरीबाहेर भरीव लिहिणारे कोसला कार
भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन खान, अरुण साधू, अनिल बर्वे आणि अनेक.
ऐतिहासिक , पौराणिक कादंबऱ्यांचे वेगळे स्थान निर्माण करणारे रणजित देसाई, शिवाजी सावंत त्यांची श्रीमान योगी आणि मृत्युंजय वाचत कित्येक पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या.
रत्नाकर मतकरींच्या गूढकथा, नारायण धारपांच्या भयकथा यांचे गारुड वेगळेच. त्यातील अनुभूती अनुभवण्याजोगीच.
स्त्री लेखिका आणि कवयित्रींनीं देखील मराठीत अतिशय सरस कामगिरी केलेली आपण अनुभवली.
विभावरी शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास, गौरी कुलकर्णींच्या कथा अन कादंबऱ्या, नीरजा, सुमती क्षेत्रमाडे, प्रिया तेंडुलकर, सानिया, आशा बगे या सर्व मानवी नात्यांचे विविध पदर उलगडणाऱ्या महान लेखिका.
आत्मचरित्रे अन त्यातून मांडलेले प्रांजळ , प्रेरक, कधी दुःखद अनुभव मांडणारे विश्राम बेडेकर, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृतिचित्रे, आचार्य अत्रेंचे कऱ्हेचे पाणी, विजया मेहतांचे झिम्मा, सुनीती देशपांडेंच आहे मनोहर तरी, लक्ष्मण मानेंच उपरा, दया पवारांचं बलुत, मल्लिका अमर शेख यांचं मला उध्वस्त व्हायचंय, अशी कित्येक महत्वाची , मापदंड असावीत अशी पुस्तक.
अलीकडच्या काळात मिलिंद बोकील, गणेश मतकरी, प्रणव सुखदेव, किरण गुरव ही विविधांगी दमदार लेखन करणारी मंडळी.
यामध्ये अनेक महत्वाचे उल्लेख आलेले नाहीत, याची जाणीव आहे. परंतु विपुल, समृद्ध, सर्व स्तरातल्या, सर्व विविध समाजाच्या लोकांनी उत्तमोत्तम लिहून आपली माय मराठी संपन्न केलेली आहे आणि ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे.
कमालीचा वेग पकडलेलं अन स्क्रीनला चिकटलेले आपले आयुष्य वाचकांची संख्या कमी करत आहे.
वाचन, मनन, सकस लेखन कमी होते आहे.
म्हणून सजगपणे, प्रयत्नपूर्वक मराठी असण्याचा अभिमान अन ही समृद्ध भाषा टिकायला हवी.
डॉ हरीश सोपान सरोदे
आपले मराठीपण #२
लेखन भाषानिर्मिती वृद्धीचा अविभाज्य भाग असतो त्यासोबत प्रांता प्रांतात जी भाषा असते तीदेखील या समृद्धीच्या वारशात मोलाची भर घालत असते.
पुण्यातली शुद्ध बोलीभाषा, नगरकडची ग्रामीण भाषा, जळगावकडचा वेगळ्या ढंगातील भाषेचा गोडवा, अहिराणी भाषा, विदर्भातील भाषा, मराठवाड्यातील भाषा, कोकणी भाषा, सातारा कोल्हापूरची बोलीभाषा या सगळ्याचा एक विशिष्ट लहेजा मराठी वाढवत गेला.
उदाहरण द्यायचे तर ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली जीवनाचे सुखदुःख साध्या सोप्या बोलीभाषेत मांडणाऱ्या कविता :
अरे संसार संसार,
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तवा मिळते भाकर,
अरे संसार संसार,
खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कयसाले
लोटा कधी म्हणू नये
( हाताले- हाताला तवा-तेव्हा कयसाले- कळसाला)
असे विविध शब्द, त्यांचे उच्चार, अर्थ हे सर्व मराठीत झिरपत गेलं. उच्चारांचे ढंग, भाषेचा लहेजा यावरून कोणत्या प्रदेशातील व्यक्ती असेल याचा अंदाज बांधता येतो तथापि लवचिक मराठीने हे शब्द आपल्या वैभवात घेऊन टाकले आहेत.
आताच शिक्षण अन त्यातील माध्यम हे बरेच वर्षांपासून बदलत इंग्लिश मध्ये प्रामुख्याने गेलं. परंतु ज्या घरांमध्ये मराठी वापराची रोजची संवादाची भाषा म्हणून बोलली जाते, तिथे अन आता पन्नाशीच्या पिढीतल्या मराठी लोकांसाठी विचार करणं, व्यक्त होणं, मनात चिंतन करणं हे मराठीतच होत अन ते मराठीत बोलणं, लिहिणं, व्यक्त होणं हे जाणीवपूर्वक करणे आपल्या आप्तजनांना आग्रह करणे फार महत्वाचे आहे.
एक मोठा समूह भाषा वापरत राहिला तर ती भाषा टिकून रहाते. वाढत्या स्क्रीन टाईमच्या वापरात वाचनाचे महत्व जगभर कमी होते आहे. पुण्यासारख्या पूर्ण मराठी शहरात खाजगी ग्रंथालये ज्यामध्ये विपूल ग्रंथसंपदा आहे ती बंद पडत आहे.
मुलांची भाषा, तरुण पिढीतील भाषा धेडगुजरी आहे.
आपल्या भाषेतील उत्तमोत्तम लेखन, कविता, ललित लेखन जतन करून टिकवून ठेवण्यासाठी आपल्यालाच, मराठी जनांना प्रयत्न करायला हवेत.
मराठीपण भाषेत तर वेगळे आहेच पण इतरदेखील काही बाबींमध्ये मराठीपण ठसा ठेवून आहे.
त्यातील महत्वाचा आणि आनंदाचा भाग म्हणजे आपले पदार्थ.
वाफाळता वरणभात आणि साजूक तूप, मसालेभात, बिरड्याची आणि इतरही उसळी, अळूची भाजी, पदर असलेल्या मऊसूत पोळ्या, दही ताक कढी , दहीभात, बटाट्याची भाजी, ताकातल्या भाज्या, आमसुलाची कढी, विविध पालेभाज्या, वाटली डाळ,
पुरणपोळी अन कटाची आमटी, गुळपोळी , खान्देशी भरीत, शेवांची भाजी , वरणबट्टी, नागपुरी वडाभात आणि तर्री, वैदर्भीय मिरच्यांची रसाभाजी, सातारा कोल्हापूरचे मटण, कोंकणी पद्धतीचे मासे ,, एक ना अनेक!
हे सर्व अनुभवलेला, चाखलेला माणूस म्हण्जेदेखील मराठीपण!
गणपती, गौरी, दसरा, दिवाळी, पाडवा याने ज्याला प्रसन्न उत्सवी वाटते ते म्हण्जेदेखील मराठीपण.
पोहे, शिरा, सांजा, साबुदाणा खिचडी मनोमन खावीशी वाटणे, मराठी गाणे, नाट्यसंगीत ऐकावेसे वाटणे, सखी मंद झाल्या तारका अथवा अजुनी रुसुनी आहे , पैल तोगे काऊ कोकताहे ऐकून एक अनाम शिरशिरी भासणे हे सर्व मराठीपणच.
हे अस्सल वैभव जपण्यासाठी, ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले आहेच:
माझा मराठीची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन
@डॉ हरीश सोपान सरोदे